तहसीलदार डॉ.शिवाजी मगर यांचे पालकांना आवाहन : १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींना लस टोचून घ्यावी
सेलू : गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या एच.पी.व्ही. लसीकरण मोहिमेच्या नियोजनासाठी १० मार्च रोजी तहसील कार्यालयात तालुका शीघ्र पथकाची बैठक घेण्यात आली. तहसीलदार डॉ. शिवाजी मगर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस गटविकास अधिकारी उदय जाधव, वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय हरबडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.के.पी.चौधरी, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी बाबासाहेब खरात आणि श्री. अंभोरे उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ.हरबडे यांनी लसीकरणाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, भारतात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण चिंताजनक असून ह्युमन पप्पीलोमा विषाणूमुळे हा आजार होतो. याला प्रतिबंध करण्यासाठी विकसित केलेली ही लस अत्यंत प्रभावी आहे. २०२२ मध्ये ७९१०३ नवीन रुग्ण आढळले होते, त्यापैकी ३४८०५ महिलांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर २०३० पर्यंत कर्करोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून १४ ते १५ वर्ष वयोगटातील ९० टक्के मुलींचे लसीकरण करण्याचे नियोजन आहे.
ही लस उपजिल्हा रुग्णालय सेलू तसेच ग्रामीण भागासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वालूर आणि देऊळगाव गात येथे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमार्फत दिली जाणार आहे. डाव्या दंडाच्या स्नायूमध्ये ०.५ मिली दिली जाणारी ही लस पूर्णपणे मोफत असून त्याची ऑनलाइन नोंदणी करून प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. शाळेतील व शाळाबाह्य १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींना ही लस टोचून घ्यावी आणि पालकांनी यासाठी सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार डॉ.शिवाजी मगर यांनी केले.