जिल्हा परिषद ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचे माध्यम : पालकमंत्री मेघना बोर्डीकर
परभणी : जिल्हा परिषद ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचे माध्यम असून ग्रामीण जनतेच्या हितासाठी प्रभावीपणे काम करणारी एक महत्त्वपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्था आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले. जिल्हा परिषदेच्या नवीन सभागृहाचे लोकार्पण ९ ऑक्टोबररोजी पालकमंत्री यांच्या हस्ते झाले, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा परषिदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, महानगर पालिका आयुक्त नितीन नार्वेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, प्रकल्प संचालक स्मिता पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता डी. एस. उडाणशिवे उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाल्या की, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील समस्या दूर करून चांगल्या सोई-सुविधा दिल्या जातात. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेचा लाभ जिल्हा परिषदेच्या यंत्रणेमार्फत लोकांना देण्याचे काम केले जाते. परभणी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांनी उत्कृष्ट काम केले आहे. परभणी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाने जिल्ह्यातील एकल महिलांचे सर्वेक्षणाचे काम उल्लेखणीय केले आहे. परभणी जिल्हा परिषदेने १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिमेमध्ये चांगले काम केले असून १५० दिवसाच्या कार्यक्रमातूनही केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत पोहचवाव्यात. तसेच जिल्ह्यात मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान सुरु असून परभणी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना या मोहिमेमध्ये सहभागी करून घेऊन राज्यस्तरावरील पुरस्कार मिळण्यासाठी सर्वांनी चांगले काम करण्याचे आवाहनही पालकमंत्री यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने आकार कुशल अंगणवाडी कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दिल्ली येथे आयोजित उडाण-२०२५ या कार्यक्रमात अंगणवाडी सेविकांचा सत्कार करण्यात आला. त्यानिमित्त अंगणवाडी सेविका वत्सला काळुराम भारशंकर, आघाव वाडी ता. जिंतूर, आशा पुरभाजी झुंझारे, आडगांव ता. जितूंर तसेच रॉकेट लर्निंग जिल्हा समन्वयक सोमनाथ चिंचकर यांचा सत्कार पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना जिल्हा परिषदेमार्फत जनतेपर्यंत पोहचविल्या जावून ग्रामीण जनतेचा विकास करण्याचे मोलाचे कार्य जिल्हा परिषदेमार्फत केले जाते. पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी म्हणाले की, जिल्हा परिषदेचे सभागृह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आले असून हे सभागृह निश्चितच उपयोगी ठरणार आहे. प्रारंभी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांनी प्रास्ताविकेतून जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. यावेळी अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
असे आहे जिल्हा परिषदेचे सभागृह : जिल्हा परिषद सदस्यांची सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभा तसेच वेगवेगळ्या विषय समिती सभा आयोजित करण्याकरिता जिल्हा परिषदेमध्ये नूतन सभागृह तयार करण्यात आले आहे. या सभागृहाचे एकूण आसन क्षमता जवळपास १५० इतकी असून यात १ प्रोजेक्टर, ७ इंटरनेट कनेक्टेड टेलिव्हिजन सेट, ८० मायक्रोफोन पॉइंट व २२ टन एअर कंडिशनिंग कार्यान्वित करण्यात आले आहे.




