मच्छीमार व मासळी विक्रेत्यांसाठी शीतगृह, विक्री केंद्रासह पायाभूत सुविधांची मागणी; मंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदन
फुलचंद भगतवाशिम :- मालेगाव तालुक्यातील मच्छीमार बांधव तसेच मासळी विक्रेत्यांच्या समस्या लक्षात घेऊन वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे आधुनिक मासळी बाजार, शीतगृह, मासळी विक्री केंद्र आणि आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आमदार भावना गवळी यांनी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू ठेवला आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
मालेगाव तालुका हा वाशिम जिल्ह्यातील अत्यंत मागासलेला तालुका असून, येथे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची मोठी गरज आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात नदी, तलाव व जलसाठे असल्याने मत्स्य व्यवसायाला मोठी संधी आहे. तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गामुळे मालेगाव परिसराच्या विकासाला आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची शक्यता आहे.मत्स्य व्यवसायाला अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र शासनाची प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना तसेच राज्य शासनाची मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना यांचा लाभ घेऊन मालेगाव येथे आधुनिक स्वरूपाचा मासळी बाजार उभारणे आवश्यक असल्याचे आमदार भावना गवळी यांनी निवेदनात नमूद केले आहे.या बाजारामध्ये आधुनिक मासळी विक्री केंद्र, शीतगृह, स्वच्छता व्यवस्था, पाणी, वीज, साठवणूक व इतर आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे मासळी विक्रेत्यांना सुरक्षित व व्यवस्थित व्यवसायाची सुविधा मिळण्याबरोबरच ग्राहकांनाही स्वच्छ आणि दर्जेदार मासळी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.विशेष म्हणजे, मालेगाव येथे आधुनिक मासळी बाजार उभारण्याच्या मागणीसाठी आमदार भावना गवळी यांचा शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे मच्छीमार व मासळी विक्रेत्यांमध्येही अपेक्षा निर्माण झाल्या असून, शासनाकडून या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळून लवकरच प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.*मत्स्य व्यवसायाला मिळणार नवी दिशा*आधुनिक मासळी बाजाराची उभारणी झाल्यास मालेगाव तालुक्यातील मत्स्य व्यवसायाला संघटित स्वरूप मिळण्यास मदत होईल. स्थानिक मच्छीमारांना बाजारपेठ उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच ग्रामीण भागातील रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासालाही चालना मिळू शकते. त्यामुळे आमदार भावना गवळी यांच्या या मागणीला मालेगावच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले आहे.





