केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
पाथरी : देशभरात नीट परीक्षेशी संबंधित तणावामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, या मागणीसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वात पाथरी शहर युवक काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी, २४ जुलै रोजी धडक मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटना घडत असून त्यामुळे शिक्षण व्यवस्थेबाबत संतापाची लाट निर्माण झाली आहे. या घटनांच्या निषेधार्थ नवी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे विद्यार्थी संघटना, सामाजिक संस्था व विविध राजकीय पक्ष आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पाथरी शहर युवक काँग्रेसच्या वतीनेही मोर्चा काढण्यात येणार आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजता चौक बाजार, पाथरी येथून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून तहसीलदारांमार्फत केंद्र सरकारला निवेदन पाठविण्यात आले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणार्या विद्यार्थी-विद्यार्थिनींवर कोणत्याही प्रकारचा लाठीचार्ज किंवा अश्रुधुराचा वापर करू नये तसेच आंदोलकांवर गुन्हे दाखल करू नयेत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.दरम्यान, या आंदोलनात शहराध्यक्ष अमोल जाधव, पाथरी शहराध्यक्ष दादाराव गवारे, आरिफ दुर्राणी, पठाण अदनान, सोहेल पठाण, सोहेल अन्सारी, तौसिफ शेख, शेख नविद, शेख अशफाख, ए.बी. राजे, शेख इरफान, अमिर खान, रैफ बसरी, राणा पठाण, शेख वाजेद, विलास कांबळे, इब्राहीम अन्सारी, वैजनाथ महिपाल, अशोक कदम, अमोल लांडगे, अबरार शेख, चंद्रकांत हिवाळे, हमीद खान, हसीब शेख, मिलींद आठवे,परवेज बेग, सय्यद शाहेद, शेख अफसर, अमन शेख, सय्यद अर्श, मुद्दसीर, अन्सारी मुस्तकीम यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.





