साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा
सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश ठेवावा. सुख विषय भोगात नाही तर त्यागतच जीवनाचे सार्थक आहे. सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार होतो, असे प्रतिपादन पद्मनाभ महाराज व्यास ( धाराशिव) यांनी केले.
पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आयोजित श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञाचे पाचवे पुष्प पद्मनाभ महाराज व्यास यांनी बुधवार ( दि.१७ ) रोजी शहरातील ‘भक्तितीर्थ’ साई मंदिरात गुंफले. पुढे बोलताना पद्मनाभ महाराज व्यास म्हणाले की” दुराचारी माणूस शतायुषी होत नाही.भगवंताचे नाम सतत घेतल्याने आणि पश्चात्ताप तीर्थाने सर्व पापे नाहीशी होतात. हातून झालेल्या कोणत्याही चुकांची पुनरावृत्ती होऊ देऊ नये. काया, वाचा मनाची अहिंसा असावी. सत्वगुणांमुळे दया निर्माण होते. कोणतीही चूक किंवा पाप होऊ नये यासाठी सदैव सावध असावे.” असेही ते म्हणाले. कथेच्या प्रारंभी. चौधरी यांनी अभंग गायन केले. सूत्रसंचालन अनिल रत्नपारखी यांनी केले. भागवत कथेत विजय बिहाणी, माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर, दत्तराव पावडे, मकरंद दिग्रसकर, डॉ. विलास मोरे, श्रीपाद कुलकर्णी, जय श्रीराम ग्रृप, मॉर्निंग ग्रृपच्या सदस्य आदींनी आरती केली. कथेस भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वेळेचे महत्त्व जाणून सदुपयोग करा : अज्ञानाच्या अंधारातून जागे व्हावे. विनम्र माणसाला ज्ञानप्राप्ती होते. आपल्याला मिळालेला वेळ खुप महत्वाचा आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी वेळेचे महत्त्व जाणून, वेळेचा सदुपयोग करायला हवा. जे शुभ कार्य उद्या करायचे आहे. ते आज,आताच करायला हवे. वेळेचे योग्य नियोजन करून जीवन जगले तरच माणसाचे भविष्य उज्वल होते.




