पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर : कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही, अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी
परभणी : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची तातडीने दखल घेत पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. त्यांनी शेतकरी आणि महिलांची विचारपूस करून त्यांना धीर दिला. या संकटकाळात राज्यसरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सर्वोतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.पालकमंत्र्यांनी सेलू तालुक्यातील रोहिणा (काजळी), राजवाडी, तसेच जिंतूर तालुक्यातील कसर, दुधगाव, आसेगाव येथील शिवारांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्यासह महसूल, कृषी, पशुसंवर्धन आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाल्या की, जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीतील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने १२८ कोटी ५५ लाख ३८ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली असून, निधी वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. या सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीची भरपाईसुद्धा तातडीने दिली जाईल. शेतकऱ्यांनी काळजी करू नये, शासन त्यांच्यासोबत आहे, असा धीर त्यांनी दिला.पालकमंत्र्यांनी कसर येथील करपरा नदीचीही पाहणी केली. शेतकऱ्यांनी त्यांना आपल्या व्यथा सांगितल्या आणि तात्काळ मदतीची मागणी केली. यावर पालकमंत्र्यांनी जास्तीत जास्त मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. शासन त्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





