पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे प्रतिपादन, सेलूत माजी सभापती अशोक काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग मेळावा उत्साहात
सेलू (जि.परभणी) : पूर्वी वापरला जाणारा ‘अपंग’ हा शब्द वगळून ‘दिव्यांग’ हा सन्मानजनक शब्द वापरून त्यांच्या आत्मसन्मानात भर घालण्याचे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचे कार्य देशाचे संवेदनशील नेतृत्व असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे, असे प्रतिपादन राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सेलू येथे बोलताना केले.
परभणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोकराव काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त संघर्ष दिव्यांग समितीच्या वतीने अभिष्टचिंतन व दिव्यांग मेळावा साई नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संघर्ष दिव्यांग समितीचे अध्यक्ष किशोर साळवे होते, तर प्रा. राजाराम झोडगे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला मुख्याधिकारी तुकाराम कदम, के.बा. शिक्षण संस्थेचे सचिव महेशराव खारकर, बाजार समितीचे संचालक रामेश्वर राठी, ऍड. अशोकराव फोफसे, गोपाळ काबरा, दिनकर वाघ, सचिन धापसे, मनीष कदम, नरेंद्र दिशागत, रमेश दौड, बंडू मुळे, गोविंदराव गायकवाड, ज्योती मोगल, संध्या चिटणीस, पंकज निकम आदी मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. मुख्याधिकारी कदम, प्रा. राजाराम झोडगे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक कॉम्रेड अशोक उफाडे यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले. शहरातील विविध संस्था, संघटना आणि असोसिएशनच्या प्रतिनिधींनी पुष्पहार, शाल आणि श्रीफळ देऊन अशोकराव काकडे यांचा सत्कार केला. कार्यक्रमाला दिव्यांग बांधव, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अतिवृष्टीग्रस्तांसाठी ५१ हजारांची मदत
सत्काराला उत्तर देताना अशोकराव काकडे म्हणाले की, दिव्यांग बांधवांसोबत जोडले जाणे हे माझे भाग्य आहे. गरजूंना मदत करणे यासारखा खरा आनंद दुसरा नाही. दिव्यांग हे मनाने सबळ असतात आणि त्यांच्या सर्व समस्या सोडवून त्यांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहू, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात उपस्थित सर्व दिव्यांगांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. कै. अण्णासाहेब काकडे सेवा भावी संस्थेच्या वतीने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ५१,००० रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पालकमंत्री बोर्डीकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.





