सेलू तालुका दबाव गट संघटनेची राज्याच्या ऊर्जामंत्र्यांकडे मागणी
सेलू : सेलू तालुक्यातील ग्रामीण भागातील सिंगल फेज लाईन गेल्या काही दिवसांपासून बंद असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शेतकऱ्यांनी वारंवार महावितरण कार्यालयात चकरा मारूनही अधिकाऱ्यांकडून कसलीही दाद मिळत नसल्याने, सेलू तालुका दबाब गट संघटनेने राज्याचे ऊर्जा मंत्री यांच्याकडे सिंगल फेज लाईन तत्काळ सुरू करण्याबाबत मागणीचे निवेदन सादर केले आहे.
महावितरण कार्यालयाच्या या तुघलकी कारभारामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. आधीच नैसर्गिक आपत्तीमुळे या वर्षी शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यात पुन्हा महावितरणच्या निर्णयामुळे शेतकरी अधिकच त्रस्त झाले आहेत.अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेल्या सोयाबीन पिकाची सध्या काढणी सुरू आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री शेतात पिकाच्या संरक्षणासाठी जावे लागते, तसेच जनावरे आखाड्यावर असतात. रात्रीच्या अंधारात वन्य प्राण्यांपासून संरक्षण होण्यासाठी रात्रीच्या वेळी सिंगल फेज लाईन चालू असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, स्थानिक महावितरण अधिकारी वर्गाच्या मनमानी व तुघलकी कारभारामुळे शेतकरी वर्ग परेशान आहे.
याआधी सिंगल फेज लाईन बारा तास चालू असे. अतिवृष्टीच्या काळात बंद पडलेला वीज पुरवठा तत्काळ सुरू करा, असे शासनाचे आदेश असतानाही येथील अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर आणि सोयाबीन पीक काढणी चालू असताना हा प्रकार सुरू आहे.त्यामुळे, या प्रकरणी महावितरण अधिकाऱ्यांना सेलू तालुक्यातील ग्रामीण भागातील सिंगल फेज लाईन बारा तास चालू ठेवण्याबाबत तात्काळ आदेश द्यावेत, अशी मागणी ऊर्जा मंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.या निवेदनावर श्रीकांत वाईकर, इसाक पटेल, ओमप्रकाश चव्हाळ, देवराव दळवे, योगेश सुर्यवंशी, अजित मंडलीक, विकास गादेवार, गुलाब पौळ, सतिश काकडे, भाऊराव सोनवणे, दिलीप मगर, मुकूंद टेकाळे, भारत झाल्टे, सुधीर आघाव, भारत रवंदळे, रामचंद्र कांबळे, उध्दव सोळंके, नारायण पवार, ज्ञानेश्वर लेवडे, राजेश बरसाले, महादेव लोंढे, विलास रोडगे, राजेंद्र केवारे, प्रकाश नाटक, परमेश्वर कादे, अक्षय बुरे, गणेश सोळंके, लिंबाजी कलाल, रौफ भाई, आबासाहेब भुजबळ, लक्ष्मण प्रधान, सुभाष काकडे, प्रकाश शिंदे, श्रीरंग डोईफोडे, रामेश्वर शेवाळे, दत्ता कांगणे, विठ्ठल काळे, परमेश्वर वीर आदींच्या सह्या आहेत.





