जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रांताध्यक्ष डॉ. विलास मोरे यांची मागणी
सेलू | प्रतिनिधी :. परभणी जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार व भेसळमुक्त अन्नपदार्थ तसेच गुणवत्तापूर्ण औषधे उपलब्ध व्हावीत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने अधिक प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी जिल्हा अन्न व औषध प्रशासन सल्लागार समितीचे सदस्य तथा अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रांताध्यक्ष डॉ. विलास मोरे यांनी केली.
शुक्रवार, १७ जुलै रोजी झालेल्या जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांना सादर केलेल्या निवेदनात जिल्हाभर अन्नपदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी नियमित व विशेष तपासणी मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली. दूध, तूप, खाद्यतेल, मसाले, मिठाई, पनीर, मावा, पॅकेज्ड पिण्याचे पाणी आदी अन्नपदार्थांचे नियमित नमुने तपासणीसाठी घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. तसेच बनावट, निकृष्ट दर्जाची व मुदतबाह्य औषधांची विक्री रोखण्यासाठी औषध दुकानांची नियमित तपासणी करावी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि एमआरपीपेक्षा जास्त दराने वस्तू किंवा औषधांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर प्रभावी कारवाई करण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.
सण-उत्सवांच्या काळात भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री रोखण्यासाठी विशेष तपासणी पथके कार्यरत करावीत, तालुका व ग्रामीण भागात तपासणीचे प्रमाण वाढवावे, ग्राहकांच्या तक्रारींच्या जलद निवारणासाठी प्रभावी ऑनलाइन व ऑफलाइन यंत्रणा उभारावी, तसेच शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था व ग्राहक संघटनांच्या माध्यमातून अन्न सुरक्षा आणि ग्राहक हक्कांविषयी व्यापक जनजागृती कार्यक्रम राबविण्याची मागणीही करण्यात आली. याशिवाय जिल्हा सल्लागार समितीच्या कामकाजात ग्राहक संघटनांचा सक्रिय सहभाग वाढवून त्यांच्या सूचना व शिफारशींचा गांभीर्याने विचार करण्यात यावा, अशी अपेक्षाही डॉ. मोरे यांनी व्यक्त केली.
ग्राहकांचे आरोग्य, सुरक्षितता आणि हक्कांचे प्रभावी संरक्षण करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने या सर्व मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी डॉ. विलास मोरे यांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अ. ए. चौधरी, जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे, ग्राहक पंचायतचे प्रांताध्यक्ष डॉ. विलास मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रेवती महाजन, जिल्हा कृषी अधिकारी एम.एस. जाधवर, जिल्हा उद्योग केंद्राचे जनरल मॅनेजर मकरंद सरकटे, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) बालाजी शिंदे, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) गोविंद मोरे, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी मोनिका रंधवे, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ विजया पवार, अन्न व्यवसाय प्रतिनिधी दीपक तलरेजा आदींची उपस्थिती होती.





