वडीच्या अंगणवाडीतील बालगोपालांची भक्तिमय दिंडी
पाथरी : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पाथरी तालुक्यातील वडी येथील अंगणवाडीतील चिमुकल्या बालगोपालांनी भक्ती आणि पर्यावरण यांचा अनोखा संगम घडवला. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या बालकांनी “मुखी विठ्ठल, हृदयी विठ्ठल, जय हरी विठ्ठल!” चा जयघोष करत गावातून भक्तिमय दिंडी काढली.
आषाढी एकादशीनिमित्त आयोजित या उपक्रमात लहानग्यांनी विठ्ठल-रखुमाईच्या वेशात सहभाग घेतला. टाळ-मृदुंगाच्या गजरात निघालेल्या दिंडीने संपूर्ण गावात वारकरी संस्कृतीची झलक दाखवली. या माध्यमातून बालकांना महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेची ओळख करून देतानाच संस्कार आणि भक्तीचे धडे देण्यात आले.“एक मूल – एक झाड” चा संकल्प दिंडीनंतर अंगणवाडी परिसरात वृक्षलागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. “एक मूल – एक झाड” या संकल्पनेतून प्रत्येक बालगोपालाने स्वतःच्या हाताने रोप लावले. लहान वयातच मुलांमध्ये निसर्गप्रेम आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, हा यामागचा उद्देश होता.या उपक्रमामुळे अंगणवाडी परिसरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. भक्ती, संस्कार आणि पर्यावरण संवर्धन एकत्र आणणाऱ्या या उपक्रमाचे गावकऱ्यांसह सर्व स्तरातून कौतुक होत आहे.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका विजयमाला गिलबिले, मिरा पांचाळ, मिना थावरे, अर्चना दुधगावकर, मंजुळा आव्हाड, राजामती आव्हाड आदींनी विशेष परिश्रम घेतले.





