आषाढी एकादशी निमित्त आयोजन
सेलू :श्रीराम प्रतिष्ठान संचलित उत्कर्ष विद्यालयात वारकरी संप्रदायाची परंपरा, संतांचे विचार आणि भारतीय संस्कृतीचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजावेत या उद्देशाने आषाढी एकादशीनिमित्त वारकरी दिंडीचे भव्य व उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले.
टाळ-मृदंगाच्या गजरात, विठ्ठलनामाच्या जयघोषात आणि अभंगांच्या सुरावटीत संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे होते. यावेळी रामरावजी रोडगे, डॉ. सविता रोडगे, आदित्य रोडगे, डॉ. अपूर्वा रोडगे (पारवे), मुख्याध्यापक श्री. कैलास ताठे आणि सौ. ज्योती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.उत्कर्ष विद्यालयातून दिंडीला प्रारंभ झाला. त्यानंतर सेलू चौक, मठ गल्ली, सेलू बसस्थानक मार्गे पुन्हा विद्यालयात दिंडीचे आगमन झाले. संपूर्ण मार्गावर विद्यार्थ्यांनी विठ्ठलनामाचा अखंड गजर करत वारकरी परंपरेचे जिवंत दर्शन घडविले.दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी पारंपरिक रिंगण, आकर्षक समूहनृत्य, भावस्पर्शी अभंग, प्रबोधनात्मक भारूड, मनमोहक गवळणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताई, संत एकनाथ आणि संत जनाबाई यांच्या वेशभूषा साकारून संतपरंपरेचा प्रभावी संदेश दिला. या सांस्कृतिक सादरीकरणातून भक्ती, समता, सामाजिक एकात्मता आणि संस्कारांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान, शिस्त, भक्तीभाव आणि सामाजिक मूल्यांची जपणूक होते, असे मत व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे नृत्यदिग्दर्शक श्री. प्रफुल सर, सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध परिश्रम घेतले. त्यांच्या सहकार्यामुळे संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय, शिस्तबद्ध आणि संस्मरणीय ठरला.





