आ.डॉ.राहुल पाटील यांच्या लक्षवेधीवर मंत्र्यांचे उत्तर
परभणी : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यापुढे देखील सुरू राहणार आणि त्यासाठी 418 कोटी रुपये निधी देण्यात आला अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास आणि रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. आमदार डॉ.राहुल पाटील यांनी याबाबत लक्षवेधी उपस्थित केल्यानंतर त्यांनी हे उत्तर दिले.
एक लाख 26 हजार प्रशिक्षणार्थींच्या प्रश्नांवर आमदार पाटील यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका मांडली. यावेळी आमदार पाटील आणि लोढा यांच्यात चांगलाच वादविवाद रंगला.
विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली. या योजनेत 11 महिन्यासाठी कौशल्य विभागामार्फत शासकीय व निमशासकीय सेवेत नियुक्ती देण्यात आली. या प्रशिक्षणाचा कालावधी एक डिसेंबर रोजी पूर्ण झालेला असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर संबंधित आस्थापनेत कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्याची आश्वासन तत्कालीन सरकारने दिले होते.मात्र ही आश्वासन अद्याप पूर्ण करण्यात आली नसल्याने परभणी जिल्ह्यासह राज्यातील एक लाख 26 हजार प्रशिक्षण घेतलेल्या युवक युवतींवर बेरोजगारीची वेळ आल्याने आमदार डॉ.राहुल पाटील यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात अखेरच्या दिवशी सरकारला याची जाणीव करून दिली. यावेळी बोलताना आमदार डॉ.पाटील यांनी आक्रमकपणे भूमिका मानत सांगितले की या प्रशिक्षणार्थ्यांमध्ये शासनाच्याप्रती असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे ही योजना केवळ निवडणुकीपूर्ती होती का ? गरज सरो वैद्य मरो अशी भूमिका शासनाची आहे का ?अशी प्रश्नांची सरबत्ती करत आमदार पाटील यांनी या योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी नोकरी देणार का असा प्रश्न केला. त्यावर मंत्रि मंगलप्रभात लोढा यांनी उत्तर दिले,ते म्हणाले या योजनेत ज्यांनी प्रशिक्षण घेतले त्यांना पुन्हा पाच महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे ही योजना बंद झाली नसून उलट या योजनेसाठी 418 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. भविष्यातही ही योजना सुरू राहील असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी उत्तराने समाधानी न झाल्याने आमदार पाटील यांनी पुन्हा मंत्री लोढा यांना सभागृहात प्रश्न विचारत धारेवर धरले. अखेर मंत्री लोढा यांनी पुन्हा ही योजना सुरू राहील याची हमी दिली.





