महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त आयोजन
शाहिरी परंपरेतून सामाजिक प्रबोधनाचा जागर; विद्रोही कवी, विचारवंत व कलावंतांची मोठी उपस्थिती
परभणी : लोककलावंत शाहीर विकास मंडळ, परभणी यांच्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त सोमवारी, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी ‘आंबेडकरी जलसा महोत्सव २०२६’ चे उत्साहात आयोजन करण्यात आले. आंबेडकरी विचार, सामाजिक प्रबोधन आणि शाहिरी परंपरेला उजाळा देत या महोत्सवाच्या माध्यमातून महाकवी वामनदादा कर्डक यांच्या प्रबोधनात्मक कार्याला अभिवादन करण्यात आले.
या वेळी बोलताना विद्रोही कवी यशवंत मकरंद यांनी, “तुमचा प्रत्येक शब्द प्रज्ञासूर्याला अर्पण, बाबासाहेबांचे रूप पाहण्या वामन नावाचे दर्पण…” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. महाकवी वामनदादा कर्डक यांनी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून समाजात समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाचा विचार पोहोचविण्याचे मोलाचे कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात त्यांच्या गीतांचे मोठे योगदान राहिले आहे.या महोत्सवामध्ये शाहिरी जलसा, सामाजिक प्रबोधन, आंबेडकरी विचारांचे सादरीकरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण झाले. ‘विचार, शाहिरी आणि प्रबोधन’ या त्रिसूत्रीवर आधारित या उपक्रमातून नव्या पिढीला वामनदादांच्या साहित्याची ओळख करून देण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बी. एच. सहजराव होते. प्रमुख अतिथी म्हणून समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त राजू एडके, तर प्रमुख पाहुणे म्हणून मनपा सदस्य आकाश लहाने, विद्रोही लेखक यशवंत मकरंद, कलावंत शेषराव नाईकवाडे, रेखा मनेरे, गायिका भारती राऊत, बळीराम आरगडे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोककलावंत शाहीर विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शाहीर काशिनाथ उबाळे, उपाध्यक्ष किसन सावने, सचिव सुरेखा साळवे, सहसचिव विजय घोडके, कोषाध्यक्ष नामदेवराव ढेपे, सदस्य भास्कर कांबळे, संतोषी भांगे यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, साहित्यिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





