सेलूतील नूतन विद्यालयाच्या गुणवंतांचा सत्कार उत्साहात
सेलू : सातत्यपूर्ण मेहनतीतूनच यश मिळते. जीवनात संकुचित विचार न करता व्यापक विचार करायला हवेत. अर्थातच नदीत नाही तर यशाच्या समुद्रात पोहायला हवे. विद्यार्थ्यांनो अभ्यास, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि ज्ञानाने यशोशिखर गाठा पण आपला देश, कुटुंब, शाळा यांचे विस्मरण होऊ देऊ नका. यशाचे आकाश स्पर्शताना आपले पाय जमिनीवरच असू द्या. आणि महत्वाचे म्हणजे शेतकरी आपल्या देशाचा कणा आहे. त्यामुळे त्यांच्या हिताच्या विचारांची जाणीव शिक्षणातून निर्माण व्हावी, असे प्रतिपादन इंजिनिअर अनिस कुरेशी यांनी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात केले.
नूतन विद्यालयातील इयत्ता दहावीतील प्रावीण्य प्राप्त, विविध स्पर्धा परीक्षा, खेळाडू अशा २०० पेक्षा अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार बुधवार, ९ सप्टेंबर २०२६ रोजी इंजि.अनिस कुरेशी यांच्या हस्ते यांच्या हस्ते कै.रा.ब.गिल्डा सभागृहात उत्साहात झाला. याप्रसंगी संस्थेच्या गुणवत्ता सन्मान आणि पालक शिक्षक संघ व जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाच्या रोख पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया होते. तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी तथा महावितरणचे कार्यकारी अभियंता अनिस रहिमोद्दीन कुरेशी (भोकर जि.नांदेड), संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, शालेय समितीचे अध्यक्ष सीतारामजी मंत्री, पालक -शिक्षक संघाचे उपाध्यक्ष प्रकाश शेरे, युनुस कुरेशी, आसेफ कुरेशी यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना इंजि.अनिस कुरेशी म्हणाले की,” शेतकरी आपल्या देशाचा कणा आहे. त्यामुळे त्यांच्या हिताचा विचार आपण करायला हवा. देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द असावी. आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या कामाप्रती आपले समर्पण, निष्ठा असावी. यशाच्या आकाशात इतकं उंच उडावे की सर्व जग दिसावे.” यावेळी इंजि.कुरेशी यांनी शाळेसाठी संगणक संच भेट देण्याचे जाहीर केले. डॉ.लोया यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.संगीत शिक्षक सच्चिदानंद डाखोरे आणि गीत मंचच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षक गणेश माळवे यांनी दिला.
प्रास्ताविक मुख्याध्यापक किरण देशपांडे यांनी केले. प्राचार्य डॉ. कुलकर्णी यांनी सहसचिव जयप्रकाश बिहाणी यांच्या संयोजनात संस्थेत राबविण्यात येत असलेल्या गुणवत्ता विकास कार्यक्रम आणि गुणवत्ता सन्मान पारितोषिक योजनेची माहिती दिली.गुणवंत विद्यार्थी यादी वाचन उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे, पर्यवेक्षक शंकर बोधनापोड, राजेंद्र सोनवणे, सुनील तोडकर, विशाल क्षीरसागर, प्रशांत नाईक यांनी केले. सूत्रसंचालन गोपाल आम्ले यांनी, तर सुशील कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमास कार्यकारिणी सदस्य अजिज खॉं पठाण यांच्यासह पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.





