सेलूतील स्वामी रामानंद तीर्थ ग्रंथालयात थोरो यांच्या विचारांवर मंथन
सेलू : येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रंथालयाच्या ‘एक दिवस एक पुस्तक’ उपक्रमात हेन्री थोरो यांच्या विचारांवर मंथन ८ सप्टेंबर, मंगळवार रोजी आयोजित कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते डॉ. पवन चांडक बोलत होते.”माणसाने साधे जीवन जगत आनंदी राहिले पाहिजे. निसर्ग माणसाच्या गरजा नक्कीच पूर्ण करू शकतो, मात्र माणसाचा हव्यास नाही. आनंदी जीवन जगण्यासाठी अतिशय मोजक्या गरजांची आवश्यकता असते, हेच विचार हेन्री डेव्हिड थोरो यांनी ‘वाल्डन’ या ग्रंथातून मांडले आहेत. थोरोंचे विचार केवळ वाचण्यापुरते मर्यादित नसून, तो आनंदी जगण्याचा वस्तुपाठ आहे,” असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते डॉ. पवन चांडक यांनी केले. जर जगाला बदलायचे असेल, तर त्याची सुरुवात प्रथम स्वतःपासूनच झाली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या वतीने आयोजित ‘एक दिवस एक पुस्तक’ या उपक्रमाचे ४४ वे पुष्प गुंफताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष संतोष कुलकर्णी उपस्थित होते.याप्रसंगी ‘ग्रंथ सखा’ पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते डॉ. पवन चांडक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यासोबतच जिल्हा परिषद परभणीचा ‘जिल्हा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल शिक्षक षडानन देशमाने, दीपस्तंभ प्रतिष्ठानचा ‘उपक्रमशील शिक्षक पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल शिक्षक कीर्ती राऊत व शिक्षक योगेश पंडित, तसेच सामाजिक कार्याबद्दलचा ‘बी द चेंज’ पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते रामराव गायकवाड यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. हा सत्कार महेशराव खारकर, चंद्रशेखर मुळावेकर, रमा बाहेती आणि प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद ठाकर यांनी केले. सूत्रसंचालन लक्ष्मण गाडेकर यांनी, तर आभार प्रदर्शन अमृपाली खाजेकर यांनी केले.या कार्यक्रमास गटविकास अधिकारी उदय जाधव, गणेश ससाने, दिपक गजभारे, वसंतराव काकडे, मंदिर जुमडे, शिवाजी बेंद्रे, प्रकाश धामणगावकर, विजय मंत्री, आप्पासाहेब गाडेकर, डॉ. मकरंद बोंठे, रघुनाथ देशमुख, सर्जेराव लहाने, के. जी. कुलकर्णी, प्रमोद देशमुख आदी शहरातील वाचक व श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माधव गव्हाणे, दिगंबर खुळे, सुयोग साळवे आदींनी पुढाकार घेतला.





