‘गोल्ड’ रेटिंग प्राप्तग्रीन मेंटर्सतर्फे पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील उल्लेखनीय कामगिरीची राष्ट्रीय दखल
परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीने पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास आणि हरित कॅम्पस उभारणीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत नॅशनल ग्रीन युनिव्हर्सिटी रँकिंग (NGUR)-२०२६ मध्ये देशात १८ वे स्थान मिळविले आहे. विद्यापीठाला १०० पैकी ९१.६ गुणांसह ‘गोल्ड’ रेटिंग प्रदान करण्यात आले आहे. ही माहिती ग्रीन मेंटर्स संस्थेने विद्यापीठाला पाठविलेल्या अधिकृत पत्राद्वारे दिली आहे. Green Mentors संस्थेने विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे यशाबद्दल अभिनंदन केले आहे.
ग्रीन मेंटर्सतर्फे आयोजित करण्यात आलेली नॅशनल ग्रीन युनिव्हर्सिटी रँकिंग (NGUR)-२०२६ ही देशातील उच्च शिक्षण संस्थांच्या शाश्वत विकास, पर्यावरण व्यवस्थापन आणि हरित उपक्रमांचे मूल्यमापन करणारी राष्ट्रीय स्तरावरील मानांकन प्रक्रिया आहे. या मूल्यमापनामध्ये शाश्वत प्रशासन, हरित परिसर, जैवविविधता, हवामान कृती, ऊर्जा कार्यक्षमता, संशोधन व नवोपक्रम, अभ्यासक्रमातील शाश्वतता, जलसंधारण, कचरा व्यवस्थापन, वाहतूक आणि समाजाभिमुख उपक्रम अशा १० निकषांवर विद्यापीठांचे मूल्यांकन करण्यात आले.विद्यापीठाच्या सादर केलेल्या कागदपत्रांचे, शाश्वत विकास उपक्रमांचे, पर्यावरणीय कामगिरीचे आणि विविध पुराव्यांचे सखोल परीक्षण करून ही मानांकन प्रक्रिया पार पडली. या मानांकनामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या शाश्वत विकास, पर्यावरणपूरक कॅम्पस उभारणी आणि हरित शिक्षण क्षेत्रातील कार्याला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, विद्यापीठाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध शाश्वत विकास उपक्रम, संशोधन सहकार्य आणि परिषदांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार आहे.या यशाबद्दल कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी नमूद केले की, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाला राष्ट्रीय ग्रीन युनिव्हर्सिटी रँकिंग (NGUR)-२०२६ मध्ये देशात १८ वे स्थान आणि ‘गोल्ड’ रेटिंग प्राप्त होणे ही संपूर्ण विद्यापीठ परिवारासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. हा सन्मान विद्यापीठातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी तसेच सर्व हितधारकांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण, ऊर्जा बचत, जलसंधारण, हरित कॅम्पस निर्मिती आणि शाश्वत विकासाच्या दिशेने विद्यापीठाने सातत्याने राबविलेल्या उपक्रमांची ही राष्ट्रीय पातळीवरील दखल आहे. भविष्यातही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० आणि शाश्वत विकास उद्दिष्टांच्या अनुषंगाने हरित, पर्यावरणपूरक आणि हवामान बदलास सक्षम असे विद्यापीठ उभारण्यासाठी आम्ही अधिक जोमाने कार्य करू.या यशाबद्दल ग्रीन मेंटर्स संस्थेने विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, नियंत्रक श्रीमती भाग्यश्री जाधव, सर्व अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, संशोधक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि सर्व संबंधितांचे अभिनंदन केले आहे.





