परभणी : भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार परभणी जिल्ह्यासाठी दिनांक ३० जुलै २०२६ रोजी वादळी वारे, विजांचा कडकडाट व अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे “रेड अलर्ट” जारी करण्यात आला आहे.
त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी विशेष सतर्कता व खबरदारी बाळगावी. अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडणे व प्रवास करणे टाळावे. नदी, नाले, ओढे, पूल, बंधारे तसेच सखल व पूरप्रवण भागात जाणे टाळावे. पाण्याचा प्रवाह असलेल्या रस्त्यावरून अथवा पुलावरून वाहन नेण्याचा प्रयत्न करू नये. विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली, विद्युत खांबाजवळ किंवा मोकळ्या जागेत थांबू नये.नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा.आपत्कालीन संपर्क : आपल्या परिसरात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, परभणी — दूरध्वनी क्र. 02452-226400, टोल फ्री क्र. 1077 तसेच संपर्क अधिकारी श्री. पवन खांडके — मो. 9975013726 या क्रमांकांवर तात्काळ संपर्क साधावा. घाबरू नका, सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि प्रशासनास सहकार्य करा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.





