परभणीत शिवसेनेच्या शेतकरी व युवा संवाद मेळाव्यास मोठी गर्दी
परभणी : राज्यातील शेतकर्यांसह लाडक्या बहिणी व युवकांच्या पाठीशी केंद्र व राज्यातील हे महायुतीचे डबल इंजिन सरकार खंबीरपणे उभे आहे. संकटाच्या काळातदेखील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी, ३० ऑगस्ट २०२६ रोजी परभणीत बोलताना दिली.
परभणी येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्टेडिअम मैदानावर शिवसेनेच्या वतीने दुपारी आयोजित शेतकरी व युवक संवाद मेळाव्यात उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी राज्याचे वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आयोजक तथा खासदार संजय जाधव, खासदार संजय देशमुख, माजी आमदार शंकरराव धोंडगे, आमदार हिकमतराव उढाण, संपर्क प्रमुख आनंद जाधव, आमदार सईद खान, ए.जे.बोराडे, परभणी जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, विशाल कदम, माजी खासदार सुरेश जाधव, माजी आमदार हरिभाऊ लहाने, परभणीचे प्रथम महापौर प्रताप देशमुख, भास्कर लंगोटे, राजू कापसे आदींसह मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सरकारच्या तिजोरीवर सर्वसामान्य शेतकर्यांचा पहिला हक्क व अधिकार आहे. त्यामुळे संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. महायुती सरकारने सातत्याने शेतकरी हिताचेच निर्णय घेतले आहेत. शेतकरी सन्मान योजनेद्वारे राज्य व केंद्र सरकारने प्रतिवर्षी १२ हजार रुपयांचे अनुदान शेतकर्यांच्या खात्यात जमा केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने अहिल्याबाई होळकर कर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या योजनेतूनच परभणी जिल्ह्यात ५०८ कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे.पुढे बोलताना शिंदे यांनी सांगितले की, महिलांचा आत्मसन्मान वाढावा या दृष्टीने महिलांकरीताही या सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. लाडक्या बहिणी लखपती व्हाव्यात, यासाठी सरकार निश्चितपणे प्रयत्न करीत आहे. शक्तीत मोठी ताकद आहे. त्यामुळे युवकांनाही मोठ्या प्रमाणावर कामे मिळावीत, तसेच युवकांच्या कौशल्य विकासाकरीता प्रयत्न सुरु आहेत. स्टार्टअप, पॅकेजींग सारख्या गोष्टींना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले जात आहे. एआयच्या माध्यमातून भविष्यात युवकांना मोठ्या प्रमाणावर काम मिळणार आहे. युवकांनी चेंजमेकर बनले पाहिजे, बदल घडविले पाहिजे, नोकरीच्या मागे लागण्याऐवजी नोकरी देणारे बनले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
▫️परभणीच्या विकासाला गती देणार
विरोधात राहून विकास कामे करता येणार नाहीत हे ओळखूनच खासदार संजय जाधव यांच्यासह सहा खासदार उठाव करून ते मूळ शिवसेनेत आले. त्यांनी आता चिंता करू नये, असे नमूद करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, परभणी शहरासह जिल्ह्याच्या विकासाचे जे जे प्रश्न प्रलंबित आहेत. या सर्व प्रश्नांची महायुती सरकारने निश्चितपणे दखल घेतली आहे. ‘जगात जर्मनी, भारतात परभणी’ ही म्हण प्रत्यक्षात साकार व्हावी, या दृष्टीने परभणीच्या विकासाला चालना देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील पायाभूत सुविधांसह विकासाकरीता सिल्क ॲन्ड मिल्क प्रकल्पाद्वारे दीड हजार कोटींच्या योजना आणल्या आहेत. यातून कृषि क्षेत्रातील जोडधंदे, शेतीच्या तंत्रास प्रोत्साहन, प्रक्रिया उद्योग, बाजारपेठ वगैरेंना प्रोत्साहन दिले जाणार आहे. परभणी महानगरांतर्गत रस्ते, नाल्या, पाणी पुरवठा, अंडर ग्राउंड ड्रिनेज, घनकचरा या प्रकल्पांना निधी दिला जाईल. कॅन्सर हॉस्पिटल उभारणी, नवीन एमआयडीसीचा प्रश्न तात्काळ मार्गी लावून, जिल्हा क्रिडा संकुलासाठी जागा उपलब्ध केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. या मेळाव्यात परभणी जिल्ह्यातील तसेच परतूर, मंठा तालुक्यातील अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. मेळाव्याला मोठ्या संख्येने नागरिक, महिला, शेतकरी, युवक आणि शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.





